विदुषी गौर
ग्लास्गो येथील २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर 'टी-४७' अंतिम शर्यतीसाठी मोहम्मद बासिल जेव्हा स्टार्टिंग ब्लॉकवर झुकला, तेव्हा त्याच्या मनात केवळ एका देशाच्या अपेक्षा नव्हत्या. दृढनिश्चय कोणत्याही मर्यादेवर मात करू शकतो, हा विश्वास घेऊन तो मैदानात उतरला होता. अवघ्या काही सेकंदांतच केरळच्या या तरुण धावपटूने थेट इतिहासाला गवसणी घातली.
बासिलने अंतिम रेषा पार करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. दुसऱ्या बाजूला त्याचा सहकारी खेळाडू दिलीप महादू गवीत याने नव्या स्पर्धैका विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या १०० मीटर 'टी-४७' शर्यतीत भारताने पहिले आणि दुसरे दोन्ही क्रमांक पटकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा ॲथलेटिक्समधील भारताची ही आजवरची सर्वात उत्तम कामगिरी ठरली.
देशभरातील कोट्यवधी क्रीडाप्रेमींसाठी हे भारताचे आणखी एक पदक होते. बासिलचा प्रवास जवळून पाहणाऱ्यांसाठी मात्र हा अनेक वर्षांच्या शांत परिश्रमांचा, अथक सरावाचा आणि अपंगत्वाला आपले भविष्य ठरवू न देण्याच्या अढळ निश्चयाचा गोड शेवट होता.
केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात जन्माला आलेल्या मोहम्मद बासिल मोर्सिंगानकथ याला जन्मतःच उजवा हात नव्हता. शारीरिक उणीव असलेल्या इतर मुलांप्रमाणे त्यालाही आपली स्वप्ने मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जाऊ शकला असता. पण त्याने पळण्याचा मार्ग निवडला.
सुरुवातीच्या काळात बासिल सामान्य खेळाडूंसोबतच स्पर्धेत उतरायचा. जवळपास आठ वर्षे तो पॅरा ॲथलेटिक्ससारखी स्पर्धात्मक प्रणाली उपलब्ध आहे, हे माहीत नसतानाच सराव करत होता अन् शर्यतीत धावत होता. त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले, पण संसाधने मर्यादित होती. सरावाच्या सुविधा साध्या होत्या आणि विशेष मार्गदर्शनाचा अभाव होता.
त्याच्या आयुष्याला खरा वळण २०२५ मध्ये मिळाले. एका व्यक्तीने त्याला पॅरा ॲथलेटिक्सची ओळख करून दिली. या नव्या बदलासाठी नव्या तंत्रांची, विशेष प्रशिक्षणाची आणि वेगळ्या स्पर्धात्मक मानसिकतेची गरज होती.
अवघ्या काही महिन्यांतच तो हाताच्या वरच्या भागातील अपंगत्व असलेल्या खेळाडूंच्या 'टी-४७' प्रकारात भारतातील सर्वात वेगवान पॅरा धावपटू म्हणून समोर आला.
याच वर्षाच्या सुरुवातीला बंगळुरू येथे झालेल्या इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये बासिलने राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ताकद दाखवून दिली. पुरुषांच्या १०० मीटर 'टी-४७' शर्यतीत त्याने १०.६३ सेकंदांची प्रभावी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीने त्याने स्वतःला भारतीय पॅरा ॲथलेटिक्समधील सर्वात आशादायक खेळाडू म्हणून सिद्ध केले.
ग्लास्गो येथील अंतिम शर्यतीत राष्ट्रकुल देशांमधील सर्वोत्तम पॅरा धावपटू एकत्र आले होते. शर्यतीची बंदूक फुटताच बासिलने कमालीच्या संयमाने ब्लॉकवरून कमालीचा वेग घेतला.
भारतीय सहकारी दिलीप महादू गवीत याच्या खांद्याला खांदा लावून धावताना त्याने संपूर्ण शर्यतीत आपला वेग कायम ठेवला अन् अखेर दुसरे स्थान मिळवत अंतिम रेषा पार केली.
२१ वर्षांच्या बासिलसाठी हे रौप्यपदक केवळ पोडियमवर उभे राहण्यापुरते मर्यादित नव्हते. तो भारतीय पॅरा खेळाडूंच्या त्या नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे, जी क्रीडा क्षेत्रातील यशाच्या व्याख्या नव्याने लिहीत आहे.
"माझी प्रत्येक शर्यत त्या मुलांसाठी एक संधी आहे, ज्यांना वाटते की शारीरिक अपंगत्वामुळे त्यांच्या स्वप्नांना मर्यादा येतात," असा भावूक संदेश बासिलने विजयानंतर माध्यमांशी बोलताना दिला.
ज्या मुलाला कधीकाळी पॅरा ॲथलेटिक्स अस्तित्वात आहे हेही माहीत नव्हते, तो आज भारताचा गणवेश घालून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पोडियमवर उभा आहे.
केवळ धावण्याच्या प्रेमापोटी प्रवास सुरू करणाऱ्या मल्लपुरमच्या या लहान मुलाचा प्रवास आधीच असाधारण बनला आहे. भारतासाठी मोहम्मद बासिलच्या वेगाचे सुवर्णदिवस अजून येणे बाकी आहे.