प्रजासत्ताक दिनाचा उत्सव देशभरात उत्साहाने साजरा होतो, पण दिल्लीच्या राजपथवरील परेडमध्ये भारतीय संस्कृती आणि लष्करी सामर्थ्याचा जो संगम दिसतो, तो अद्वितीय असतो. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील अशा व्यक्तींना 'राष्ट्रपतींचे अतिथी' म्हणून आमंत्रित केले जाते, ज्यांनी आपल्या कार्यातून समाजात बदल घडवला आहे. यंदा या विशेष पाहुण्यांमध्ये बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील सिसवा पूर्व पंचायतीच्या सरपंच तानिया परवीन यांच्या नावाचा समावेश आहे.
तानिया यांनी आपल्या नेतृत्वाखाली सिसवा पूर्व पंचायतीचा असा कायापालट केला आहे की, आज ही पंचायत संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरली आहे. मनापासून आणि कठोर मेहनत घेतली तर गावही शहरासारख्या सुविधांनी सज्ज होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या याच कर्तृत्वाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना प्रजासत्ताक दिन २०२६ च्या मुख्य कार्यक्रमात लाल किल्ल्यावर विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे.
तानिया यांचे शिक्षण इंजिनीअरिंगमध्ये झाले असून त्यांना सरकारी नोकरीही मिळाली होती. मात्र, आपल्या गावाची दुरवस्था पाहून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज सिसवा पंचायतीमध्ये शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत.
अल्पसंख्याक बहुल भाग असल्याने तानिया यांच्यासमोर आव्हाने मोठी होती. बालमजुरी, कमी वयात होणारे विवाह आणि महिलांवरील हिंसाचार या प्रमुख समस्या होत्या. कोविडच्या काळात लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. तानिया यांनी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी सरपंचपद स्वीकारले आणि गेल्या तीन वर्षांत सिसवा गावाला आत्मनिर्भर बनवले.
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळेत स्मार्ट क्लास आणि कॉम्प्युटर लॅब सुरू केल्या. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेचा प्रभाव असा पडला की, शाळा सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण आता शून्यावर आले आहे. महिलांना रोजगारासाठी मनरेगा आणि पीएम विश्वकर्मा योजनेशी जोडल्यामुळे २००० हून अधिक महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. गावात पथदिवे लावल्यामुळे आता गावाची अर्धी लोकसंख्या म्हणजेच महिला रात्रीच्या वेळी स्वतःला सुरक्षित अनुभवतात.
तानिया परवीन सांगतात की, २०१६ मध्ये जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा रस्ते तुटलेले होते आणि सांडपाण्याची कोणतीही सोय नव्हती. त्यांनी ठरवले की पंचायतीचे चित्र बदलायचे. आज सिसवा पंचायत भवनात 'आरटीपीएस' काउंटर आहे, जिथे जन्म-मृत्यू दाखल्यापासून ते पेन्शनच्या कामापर्यंत सर्व कागदपत्रे एकाच छताखाली मिळतात.
पुढील काळात गावातील कामकाज पूर्णपणे डिजिटल करणे आणि मुलींसाठी मार्शल आर्ट्स प्रशिक्षण केंद्र सुरू करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. तानिया परवीन आज बिहारमधील महिला नेतृत्वाचे एक खंबीर प्रतीक बनल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत त्या केवळ बिहारचेच नव्हे, तर ग्रामीण विकासाच्या जिद्दीचे प्रतिनिधित्व करतील.