वर्षा देशपांडे : ग्रामीण भारतातील दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक महिलांचा आवाज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 19 h ago
सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांचा युएन पॉप्युलेशन अवॉर्डने सन्मान
सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांचा युएन पॉप्युलेशन अवॉर्डने सन्मान

 

संघर्ष, संवेदना आणि सामाजिक बदल यांचा जर एखादा जिवंत पुरावा पाहायचा असेल, तर महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील ग्रामीण, आदिवासी, अल्पसंख्याक, वंचित आणि दलित महिलांना न्याय, सन्मान आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी वाहून घेतले.

२०२५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या या अतुलनीय कार्यासाठी त्यांना ‘यूएन पॉप्युलेशन अवॉर्ड’ देऊन गौरवले आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या भारतातील तिसऱ्या व्यक्ती ठरल्या. यापूर्वी १९८३ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि १९९२ मध्ये उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांना हा सन्मान मिळाला होता.

वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार वैयक्तिक श्रेणीत मिळाला. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एका दिमाखदार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ त्यांच्या सामाजिक लढ्याची आंतरराष्ट्रीय मान्यता नाही, तर भारतात कित्येक दशके उपेक्षित ठेवण्यात आलेल्या वर्गाचा आवाज जागतिक मंचावर पोहोचवण्याची ऐतिहासिक घटना आहे. 

ग्रामीण भारतातून उमटलेला बदलाचा आवाज
वर्षा देशपांडे यांनी १९९० मध्ये ‘दलित महिला विकास मंडळ’ स्थापन केले. तेव्हा हे काही मोठे संघटन नव्हते, तर केवळ एक विचार विचार होता. त्यांचे स्वप्न होते की भारतातील उपेक्षित महिलांनी केवळ हक्क मागायचे नाहीत, तर ते मिळवायचे सुद्धा. त्यांनी दलित महिला, विधवा, आदिवासी महिला, अल्पसंख्याक महिला आणि कौटुंबिक हिंसेच्या बळी ठरलेल्या महिला अशा समाजातील सर्व प्रकारच्या शोषित वर्गासोबत काम सुरू केले.

त्यांनी पाहिले की ग्रामीण भारतातील महिला केवळ सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही खचलेल्या अवस्थेत आणि भयात जगत होत्या. त्यांना शिक्षण मिळत नव्हते, आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या आणि मालमत्ता किंवा निर्णय घेण्याचा हक्कही नव्हता. वर्षा यांनी या समस्यांना आव्हान देण्याचे ठरवले.

वर्षा देशपांडे यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे लिंग आधारित भ्रूण हत्येविरुद्धचा लढा. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये कन्या भ्रूण हत्येच्या घटना वाढत होत्या. समाजात अशी मानसिकता पसरली होती की मुलगा असणे अभिमानाचे आहे, तर मुलगी असणे ओझे आहे. ही मानसिकता बदलणे सोपे नव्हते. वर्षा यांनी पीसीपीएनडीटी (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकार, प्रशासन आणि समाजावर दबाव टाकला.

त्यांनी अवैध लिंग चाचणी केंद्रांचा पर्दाफाश केला. अनेक डॉक्टरांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. लिंग निवडीची प्रवृत्ती समाजविरोधी गुन्हा आहे, असे ठणकावून सांगितले. यासोबतच त्यांनी गावोगावी जनजागृती करण्यासाठी महिला स्वयंसेवी गट स्थापन केले. ते गट लोकांना समजावून सांगत की मुलगी असणे पाप नाही, तर वरदान आहे.

वर्षा म्हणतात, “आम्ही पाहिले की मुलींची हत्या केवळ रुग्णालयांमध्ये होत नाही, तर ती मानसिकता समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरली आहे. आम्हाला केवळ कायद्याने नाही, तर संस्कारांनी लढावे लागले."

वर्षा यांचे काम केवळ हक्कांच्या मागणीपुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यांनी महिलांना व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. त्यामध्ये शिलाई, सेंद्रिय शेती, अन्न प्रक्रिया, हस्तकला यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. आज त्यांच्या संघटनेत सामील असलेल्या शेकडो महिला स्वतःचा व्यवसाय चालवतात आणि आपल्या कुटुंबाची आधारस्तंभ बनल्या आहेत.

याशिवाय त्यांनी महिलांना संयुक्त मालमत्ता नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले, जेणेकरून त्या घर किंवा जमिनीच्या कायदेशीर सहमालक बनल्या पाहिजेत. यामुळे महिलांच्या कौटुंबिक आणि सामाजिक स्थानात क्रांतिकारी बदल घडला. त्यांनी किशोरवयीन मुलींसाठी शिक्षण आणि नेतृत्व प्रशिक्षण सुरू केले. पुरुष आणि मुलांचा सहभाग असणारे उपक्रम राबवून हे दाखवून दिले की लैंगिक समानता ही केवळ महिलांचा विषय नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.

'यूएन पॉप्युलेशन अवॉर्ड'ने सन्मानित
यूएन पॉप्युलेशन अवॉर्डची घोषणा करताना यूएनएफपीए (UNFPA) च्या भारतातील प्रतिनिधी एंड्रिया एम. वोजनार म्हणाल्या, “वर्षा यांचे काम भारताच्या ग्रामीण सामाजिक संरचनेला बदलणारे आहे. त्यांनी दाखवून दिले की, लिंग, जात किंवा धर्म यांच्यामुळे होणारा भेदभाव असो किंवा प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच खरे मानवाधिकार आहे. त्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी कार्यकर्त्या आहेत.”

पुरस्कार स्वीकारताना वर्षा देशपांडे म्हणाल्या, “हा पुरस्कार फक्त माझा नाही तर, हा त्या हजारो महिलांचा सन्मान आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःला बदलण्याचे धैर्य दाखवले. हा त्या कार्यकर्त्यांचाही सन्मान आहे, जे नाव किंवा ओळख नसतानाही रोज लढतात. मला आशा आहे की हा सन्मान भारतासह जगाला आठवण करून देईल की मुलींचे आयुष्य अमूल्य आहे.”

काय आहे 'यूएन पॉप्युलेशन अवॉर्ड'
यूएन पॉप्युलेशन अवॉर्ड (United Nations Population Award) १९८१ मध्ये स्थापन करण्यात आला आणि १९८३ मध्ये पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दरवर्षी जनसंख्या आणि प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जातो.

यात सुवर्णपदक, प्रमाणपत्र आणि रोख रकमेचा समावेश आहे. याच्या निवड समितीत आठ संयुक्त राष्ट्र सदस्य देशांचा समावेश आहे आणि याचे सचिवालय यूएनएफपीएकडे आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला जागतिक स्तरावर 'जनसंख्या हक्कांचा अग्रदूत' म्हणून सन्मानित केले जाते. 

वर्षा देशपांडे यांचे नाव आता या यादीत समाविष्ट झाल्याने ना केवळ भारताची प्रतिष्ठा वाढली, तर खऱ्या मनाने आणि संवेदनेने केलेले काम जगाच्या नजरेस पडले. 

प्रेरणादायी क्रांती
आज जेव्हा आपण महिला सशक्तीकरण, बेटी बचाओ-बेटी पढाओ आणि नारी शक्ती यासारख्या घोषणा देतो, तेव्हा वर्षा देशपांडे आपल्याला दाखवतात की बदल केवळ योजनांनी होत नाही, तर सहभागाने घडतो. त्यांनी ना प्रसारमाध्यमांचा आधार घेतला, ना सोशल मीडियावर गाजावाजा केला, तर गावच्या मातीशी थेट जोडून काम केले. त्यांच्यासाठी प्रत्येक महिला एक विश्व आहे आणि प्रत्येक मुलगी भविष्याचा प्रकाश आहे. त्यांचा हा सन्मान भारतातील सर्व महिलांच्या संघर्ष, धैर्य आणि सामूहिक चेतनेची जागतिक मान्यता आहे.

वर्षा देशपांडे एक नाव नाही, एक विचार आहे. त्या या शतकातील त्या दुर्मीळ महिलांपैकी एक आहेत, ज्यांनी आपले आयुष्य घोषणांमध्ये नाही, तर नम्र क्रांतीत बदलले. त्यांनी ना कोणत्या पदाची अपेक्षा ठेवली, ना प्रशंसेची. आज जेव्हा संयुक्त राष्ट्र त्यांचा सन्मान करते, तेव्हा हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर भारतातील त्यानारी क्रांतीचा सन्मान आहे, जी प्रत्येक गावात, प्रत्येक अंगणात आपला आवाज घुमवत आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter