'यामुळे' स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजरा केला जातो 'राष्ट्रीय युवा दिन'

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 3 Months ago
स्वामी विवेकानंद फोटो
स्वामी विवेकानंद फोटो

 

भारतात दरवर्षी १२ जानेवारीला 'राष्ट्रीय युवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते. भारत सरकारने १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस हा ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर, १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. ही परंपरा आजतागायत कायम आहे. आजच्या दिवशी देशात सर्वत्र स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आणि युवा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

हा दिवस साजरा करण्यामागचा आणखी एक हेतू म्हणजे आजच्या तरूणाईमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांबदद्लचे महत्व वाढवणे हा आहे.

१२ जानेवारीलाच का साजरा केला जातो युवा दिन?
स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि त्यांचे जीवन यांमधून तरूणांना प्रेरणा मिळते. मानवतेची सेवा हाच खरा धर्म मानून स्वामी विवेकानंद यांनी तरूणांसाठी भरीव कार्य केले होते. स्वामी विवेकानंद हे धर्म, इतिहास, तत्वज्ञान, कला, साहित्य आणि सामाजिक शास्त्रातील तज्ज्ञ होते.

स्वामी विवेकानंद यांना भारतीय शास्त्रीय संगीताची विशेष आवड होती. त्यांचे विचार आणि कार्य आज ही तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. विवेकानंद यांचे हे अनमोल विचार आणि त्यांचे जीवन तरूणांना नेहमीच प्रोत्साहन देते.

स्वामी विवेकानंद यांचे हे अनमोल विचार आणि कार्य तरूणाईमध्ये असेच जागृत रहावेत, यासाठीच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी म्हणजे १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय युवा दिनाचे खास महत्व
देशाचे भविष्य हे तरूणाईवर अवलंबून आहे. उद्याचा विकसित भारत हा तरूणांच्या हाती आहे, असे नेहमी म्हटले जाते आणि हे खरे देखील आहे. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये त्या देशातील तरूणाईचे योगदान असते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तरूणांना योग्य मार्गदर्शन मिळणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे, या राष्ट्रीय युवा दिनाचे खास असे महत्व आहे.