गुवाहाटी
आसाममध्ये सुरू असलेल्या भीषण पूरपरिस्थितीत आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा ८० वर पोहोचला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमधील २ लाख १२ हजार नागरिक अद्यापही पुरामुळे प्रभावित झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, राज्य सरकारने पूरग्रस्तांना मोठा दिलासा देत सर्व प्रकारच्या कर्जाच्या परतफेडीवर सहा महिन्यांची स्थगिती (मॉरेटोरियम) जाहीर केली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नवीन मृत्यू सिवासागर जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. गोलघाट, सिवासागर, विश्वनाथ, चराईदेव, कामरूप (महानगर), जोरहाट, धेमाजी आणि नगाव या आठ जिल्ह्यांमधील २१ महसूल मंडळे आणि ४३७ गावे पुराच्या विळख्यात आहेत. चराईदेव जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे ८० हजार लोक प्रभावित झाले असून त्यापाठोपाठ सिवासागरमध्ये ७१ हजार आणि जोरहाटमध्ये ४० हजार नागरिक बाधित झाले आहेत. पूरस्थिती काहीशी सुधारली असली तरी प्रशासनाकडून ४ जिल्ह्यांत ११२ मदत छावण्या सुरू आहेत.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, राज्य स्तरीय बँकर्स समितीच्या (SLBC) विशेष बैठकीत सिवासागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलघाट या पूरग्रस्त जिल्ह्यांतील ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व भागांतील पूरग्रस्तांना त्यांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी सहा महिन्यांची स्थगिती दिली जाईल आणि कर्जाचा कालावधी १ ते ७ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
तसेच, चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकासमोर (IMCT) राज्य सरकारने विशेष मदत पॅकेजची मागणी केली आहे. या पुराला 'अटिपिकल, उच्च-प्रत्त्वेची आणि जलद-सुरुवात झालेली आपत्ती' म्हणून मान्यता देण्याची मागणीही करण्यात आली आहे.