मुंबई
अन्नभेसळीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या समाजकंटकांवर कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लावण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांचे आणि विशेषतः लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अशा प्रकारच्या गैरप्रकारांना कोणत्याही प्रकारे पाठिशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत पार पडलेल्या 'विकसित महाराष्ट्र २०४७' अंतर्गत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या सादरीकरणादरम्यान हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यान्नांमध्ये होणारी भेसळ हा सामान्य गुन्हा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळणारा गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध आणि इतर उत्पादनांचे सेवन करतात. बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात, ज्यामुळे भावी पिढीचे भविष्य धोक्यात येत आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणताही कायदेशीर पळवाट मिळू नये यासाठी अजामीनपात्र गुन्हे दाखल करून विशेष कायदेशीर टीम स्थापन करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.