तरुणांच्या संधींवर गदा येऊ देणार नाही; स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे मोठे भाष्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 21 h ago
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

नवी दिल्ली :

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना देशातील युवा शक्ती आणि स्पर्धा परीक्षांच्या महत्त्वावर विशेष भर दिला. भारत वेगाने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना देशातील तरुण पिढी या प्रवासाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील तरुणांची आहे. ही तरुण पिढी भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांच्या संधी आणि परीक्षा पद्धतीवर महत्त्वाचे विचार मांडले.

स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता राखणे ही संयुक्त जबाबदारी

स्पर्धा परीक्षा हे देशातील लाखो होतकरू तरुणांच्या प्रगतीचे आणि संधींचे मुख्य प्रवेशद्वार आहे, असे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केले. त्यामुळे या सर्व परीक्षांमधील पारदर्शकता, अचूकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे ही सरकार, यंत्रणा आणि संपूर्ण समाजाची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तरुणांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या भविष्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

यासोबतच, क्रीडा क्षेत्रात देशातील तरुणांनी आणि विशेषतः महिला खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले. ग्लास्गो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने मिळवलेल्या १३ सुवर्णपदकांपैकी ८ सुवर्णपदके महिला खेळाडूंनी जिंकून देशाचा गौरव वाढवला असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक प्रगती

युवा कल्याणासोबतच राष्ट्रपतींनी देशाच्या सुरक्षेवर ठाम भूमिका मांडली. शत्रूच्या दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्याची भारतीय सैन्याची ताकद 'ऑपरेशन सिंदूर'ने जगाला दाखवून दिली आहे, असे त्या म्हणाल्या. दहशतवाद पसरवणाऱ्यांना कुठेही आश्रय मिळणार नाही आणि त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

जागतिक स्तरावर मंदीचे सावट असतानाही भारताची अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने पुढे जात आहे. देशातील सर्वसमावेशक योजनांमुळे २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडले असून, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जगभरातील निम्म्याहून अधिक डिजिटल व्यवहार एकट्या भारतात होत असल्याचे राष्ट्रपतींनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले.