नुरुल हक, आगरतळा
देशभरात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. त्याच वेळी त्रिपुरातल्या सोनामुरा इथल्या रांगामटिया दारुल उलूम मदरशातही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा झाला. डोक्यावर धार्मिक टोपी आणि धार्मिक पेहराव परिधान केलेल्या मदरशाच्या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं मन राष्ट्रभक्तीने भरून आलं होतं. राष्ट्रध्वज फडकवणं, राष्ट्रगीत, वंदे मातरम, तिरंगा रॅली आणि देशभक्तीपर घोषणांनी मदरशाचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमात शिक्षक आणि मौलवींनी मदरशाच्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेश दिला. देशासाठी केलेलं मोठं बलिदान, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि भारतीय संविधानाची मूल्यं डोळ्यांसमोर ठेवून तरुण पिढीने पुढे जावं, असं आवाहन तिथे करण्यात आलं.

या कार्यक्रमात बोलताना मदरशाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातल्या विविध समुदायांच्या लोकांच्या योगदानावर प्रकाश टाकला. ब्रिटिशांविरोधातल्या लढ्यात मुस्लिम समाजाने बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेच्या विविध पैलूंवर तिथे सविस्तर चर्चा झाली. टीपू सुलतान, १८५७ च्या महाबंडातले बहादूर शाह जफर, बेगम हजरत महल, मौलवी अहमदुल्ला शाह, बख्त खान, मौलाना फजल-ए-हक खैराबादी यांच्यापासून ते मौलाना महमूदुल हसन देवबंदी, उबैदुल्ला सिंधी, मौलाना अबुल कलाम आझाद आणि शहीद अशफाकउल्ला खान यांसारख्या महान व्यक्तींच्या नावांचा या भाषणांमध्ये आवर्जून उल्लेख झाला. त्यांचा संघर्ष, तुरुंगवास, बलिदान आणि देशभक्तीबद्दल माहिती देऊन महत्त्वाची गोष्ट तिथे सांगितली गेली. भारताचं स्वातंत्र्य हे कोणत्याही धर्माचं, जातीचं किंवा समुदायाचं यश अजिबात नाहीये. १८५७ च्या महाबंडापासून ते असहकार, खिलाफत, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनापर्यंतच्या विविध टप्प्यांवर हिंदू आणि मुस्लिमांसह देशातल्या विविध समुदायांच्या लोकांनी ब्रिटिशांविरोधातल्या चळवळीत सहभाग घेतला होता. हा इतिहास तरुण पिढीसमोर मांडणं खूप गरजेचं आहे, असं स्पष्ट मत वक्त्यांनी व्यक्त केलं.
रांगामटिया मदरशाच्या या स्वातंत्र्यदिनाच्या आयोजनातून इतिहासाच्या आठवणी, देशभक्ती आणि जातीय सलोख्याचा सुंदर संदेशही समोर आला. हातात तिरंगा घेतलेल्या विद्यार्थ्यांची रॅली आणि 'भारत माता की जय' सारख्या राष्ट्रीय घोषणांनी मदरशाचा परिसर पूर्णपणे उत्सवाच्या रंगात रंगून गेला. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात देशाची शांतता, सुरक्षा आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. सर्व धर्म आणि समुदायातल्या लोकांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन केलं गेलं. तरुण पिढीने खरा इतिहास जाणून घ्यावा, हुतात्म्यांच्या बलिदानाचा सन्मान करावा आणि देश व लोकांच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित करावं, असंही आवर्जून सांगण्यात आलं.

धर्म प्रत्येकाचा वैयक्तिक असला तरी देश सर्वांचा आहे, या विचाराची आठवण रांगामटिया दारुल उलूम मदरशाच्या या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाने पुन्हा करून दिली. स्वातंत्र्याचा इतिहास हा सर्व भारतीयांच्या एकत्रित अभिमानाचा इतिहास आहे, हे सत्य यातून पुन्हा समोर आलं. स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षात तोच इतिहास समोर ठेवून सलोखा, मानवता, न्याय आणि देशभक्तीचं बंधन अधिक मजबूत करण्याचा संकल्प सोनामुराच्या रांगामटिया मदरशातून करण्यात आला. त्यानंतर मदरसा परिसरातून तिरंगा रॅली काढण्यात आली आणि या रॅलीने शहराच्या विविध भागांतून उत्साहात मार्गक्रमण केलं.