नवी दिल्ली
रशियन सैन्यात अद्याप सुमारे दोन डझन (२४) भारतीय नागरिक कार्यरत असून त्यांना सुरक्षितपणे लवकरात लवकर सोडवून आणण्यासाठी भारत सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. रशियन लष्करी युनिट्समध्ये स्वयंपाकी आणि मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मुक्त करावे, अशी मागणी भारताने वारंवार रशियाकडे केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नियमित साप्ताहिक प्रसारमाध्यम ब्रीफिंगदरम्यान सांगितले की, भारत सरकारने केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत एकूण १३९ भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात आली आहे. उर्वरित सुमारे दोन डझन भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी रशियन प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना सावध करत धोकादायक आणि खात्रीशीर नसलेल्या परदेशी नोकरीच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.