त्रिवेणी-सप्तग्रामची प्राचीन खानकाह: बंगालच्या सुफी इतिहासाचा विस्मरणात गेलेला सुवर्णकाळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 4 h ago
बंगालच्या समृद्ध सुफी वारशाची साक्ष देणारा ऐतिहासिक परिसर आणि दर्ग्याची वास्तू.
बंगालच्या समृद्ध सुफी वारशाची साक्ष देणारा ऐतिहासिक परिसर आणि दर्ग्याची वास्तू.

 

शम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातलं त्रिवेणी-सप्तग्राम एकेकाळी बंगालमधल्या सर्वात समृद्ध बंदर शहरांपैकी होतं. स्थानिक परंपरेनुसार सरस्वती, भगीरथी आणि यमुना नद्यांच्या संगमावरचा हा प्रदेश आपल्या भरभराटीला आलेल्या व्यापारासाठी खूप प्रसिद्ध होता. त्यासोबतच मध्ययुगीन काळात तो सुफी अध्यात्माचं महत्त्वाचं केंद्र म्हणूनही उदयाला आला.

जलमार्गांनी दिल्ली, गौर आणि पांडुआशी जोडल्या गेलेल्या या प्रदेशाने अनेक सुफी संतांना आकर्षित केलं. त्यांनी इथे येऊन अनेक खानकाह स्थापन केल्या. या प्राचीन खानकाहच्या वास्तूंचे अवशेष आज फारसे शिल्लक नाहीत. तरीही स्थानिक लोकांच्या आठवणी, जुन्या नोंदी आणि दर्ग्यांशी जोडलेल्या परंपरांमधून त्यांचा इतिहास आजही जिवंत आहे.

इतिहासकारांच्या मते, १३ व्या आणि १५ व्या शतकादरम्यान सप्तग्राम हे बंगालच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रांपैकी होतं. अरब, पर्शियन आणि मध्य आशियायी व्यापाऱ्यांसोबतच अनेक सुफी संतही या प्रदेशात दाखल झाले. त्यांनी स्थापन केलेल्या खानकाह केवळ धार्मिक भक्तीची ठिकाणं नव्हती. प्रवाशांसाठी निवारा, शिक्षणाची केंद्रं आणि समाजसेवेच्या संस्था म्हणूनही त्यांनी मोठं काम केलं.

या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, कुराण पठण, जिकिर आणि मानवतावादी उपक्रम एकमेकांच्या सोबतीने उत्तमरीत्या चालवले जायचे. लंगरखाना हे या खानकाहचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. सुफी तत्त्वज्ञानात भुकेल्यांना अन्न देणं हे उपासनेचं रूप मानलं जातं. या विचारानुसार त्रिवेणी-सप्तग्रामच्या खानकाहांनी दररोज किंवा विशेष प्रसंगी मोफत अन्न वाटपाची मोठी व्यवस्था केली होती. नदीमार्गे येणारे खलाशी, व्यापारी, गरीब लोक आणि प्रवाशांना अन्न व निवारा दिला जायचा. संशोधकांच्या माहितीनुसार, असे लंगरखाने बंगालच्या अनेक भागांमध्ये सामाजिक आधाराचं सुरुवातीचं रूप म्हणून मोठं काम करत होते.

त्रिवेणी-सप्तग्रामच्या खानकाहचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जातीय सलोख्याची केंद्रं म्हणून त्यांची असलेली भूमिका. त्यांनी धर्म, जात आणि सामाजिक स्थितीच्या भिंती पूर्णपणे ओलांडल्या होत्या. आशीर्वाद घेण्यासाठी, सल्ला मागायला किंवा नवस फेडायला स्थानिक हिंदू, मुस्लिम आणि इतर समुदायांचे लोक या सुफी संतांकडे आवर्जून येत असत. मानवता, करुणा आणि प्रेमाच्या शिकवणीने या खानकाहांना सामान्य लोकांसाठी श्रद्धा व मनःशांतीची मोठी केंद्रं बनवलं. बंगालमध्ये सामाजिक सलोख्याचा पाया रचण्यात अशा सुफी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असा इतिहासकारांचा ठाम विश्वास आहे.

काळाच्या ओघात सप्तग्रामने बंदर म्हणून आपलं पूर्वीचं महत्त्व गमावलं. नद्यांच्या पात्रात झालेले बदल, शहरीकरण आणि वेळेचा मोठा प्रभाव या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम झाला. अनेक प्राचीन वास्तू हळूहळू नाहीशा झाल्या. तरीही त्रिवेणी आणि आसपासच्या भागातले अनेक सुफी दर्गे, मजार आणि पीरांशी जोडलेल्या कुटुंबांच्या रूपात या वारशाच्या काही खुणा आजही जिवंत आहेत.

खादिम आणि पीर कुटुंबांची आजची पिढी केवळ धार्मिक विधी व समारंभ पुढे नेत नाहीये. त्यासोबतच जुनी कागदपत्रं, वंशावळ आणि मौखिक इतिहास जतन करायला ते मोठे प्रयत्न करताहेत. गरिबांना मदत करणं आणि धार्मिक शिक्षण देणं अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही अनेक जण खूप सक्रिय आहेत.

दरवर्षी उरुसाच्या निमित्ताने हजारो भाविक या भागातल्या दर्ग्यांवर मोठ्या संख्येने एकत्र येतात. या ठिकाणांच्या आजूबाजूला तात्पुरती बाजारपेठ उभी राहते. तिथे फुलं, चादरी, अत्तर, धार्मिक पुस्तकं आणि स्थानिक खाद्यपदार्थ विकणारी अनेक दुकानं थाटली जातात. या काळात छोटे व्यापारी, वाहतूक कर्मचारी, फेरीवाले आणि स्थानिक कारागिरांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याच्या मोठ्या संधी मिळतात. म्हणूनच उरूस केवळ धार्मिक प्रसंग राहिलेला नाही. स्थानिक अर्थव्यवस्थेतही तो महत्त्वपूर्ण योगदान देतो.

त्रिवेणी-सप्तग्रामच्या प्राचीन खानकाहच्या इतिहासावर अद्याप पुरेसं संशोधन आणि दस्तऐवजीकरण झालेलं नाही. नदीची धूप, शहरीकरण आणि काळाचा मोठा प्रभाव पडून अनेक ऐतिहासिक अवशेष पूर्णपणे नष्ट झालेत. अधिक पुरातत्वीय संशोधन, प्राचीन कागदपत्रांचं जतन आणि स्थानिक वारशाचं पद्धतशीर दस्तऐवजीकरण करणं आवश्यक आहे. यातून बंगालच्या सुफी इतिहासाचे अनेक अज्ञात अध्याय प्रकाशात आणायला मोठी मदत मिळू शकेल.

हेही वाचा: फल्गू नदीच्या तीरावर वसलेल्या ६०० वर्ष जुन्या सुफी दर्ग्याची गाथा

आजही त्रिवेणी-सप्तग्रामच्या मातीवर उभं राहिल्यावर इतिहास अतिशय शांतपणे आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देतो. इथल्या खानकाहचे दरवाजे एकेकाळी सर्वांसाठी पूर्णपणे खुले होते. धार्मिक भेदांपेक्षा मानवता मोठी होती, कर्मकांडांपेक्षा सेवा मोठी होती आणि मतभेदांपेक्षा सलोखा अधिक भक्कम होता, हा तो मोठा संदेश आहे. हा मानवतावादी वारसा बंगालच्या सुफी परंपरेच्या उत्कृष्ट आणि चिरंतन अभिव्यक्तींपैकी आजही टिकून आहे.